Monday, August 18, 2008

वेल प्लेड अखिल !!

वेल प्लेड अखिल !!
दचकला असाल कदाचित.. कारण आत्ताच अखिल बॉक्सिंगच्या ५४ किलो गटातील उपउपांत्यफेरीतून बाहेर पडला..
आता आपला मेंदू बाजूला काढुन ठेवणार्‍या वृत्तवाहिन्यांवर या सर्व गोष्टींचा उहापोस सुरु झाला सुद्धा असेल..
असे असतांना त्याला वेल प्लेड कशासाठी...


कारण..


एकेकाळी क्रिकेट हा एकमेव खेळ मानला जात होता आणि इतर खेळ केवळ दुरदर्शनच्या बातम्यामधुन दिसायचे... अशा परिस्थितीत अभिनव पाठोपाठ ऑलिंपिक पदकाची आशा भारतीयांच्या मनात उमटवली हेच या खेळाडूंच मोठं यश म्हणता येईल.


अखिलने जर पदक मिळवले असतेच.. तर बिजिंग मध्ये तिरंगा वर जातांना बघुन नक्कीच अभिमान वाटला असता.. पण या स्पर्धेत उतरण्यापुर्वी संभाव्य पदक विजेत्यांमधे फारसा उल्लेख नसलेल्या या खेळाडूंनी आजवर केलेली कामगिरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल...


आज नाही विजय मिळाला पण हरकत नाही.. निदान या खेळांकडे बघण्याचा दृष्टीकोन तरी बदलेल... आणि हाच अखिल आणखी अनेक जणांसोबत पुढच्या ऑलिंपिक मध्ये निर्विवाद विजय सुद्ध मिळवेल.. अर्थात हा सर्व आशावाद वाटत असेलही .. पण आशेवरच जग चालते नाही का !!!


सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... आणि सरकारला प्रार्थना की निदान आतातरी या सगळ्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी तरतूद करावी...

Wednesday, August 13, 2008

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!

बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिरंग्याची शान वाढविल्याबद्दल अभिनव बिंद्राचे मनापासून अभिनंदन

Saturday, May 17, 2008

शुभेच्छा !

आज सकाळीच म. टा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3047200.cms मध्ये ही बातमी वाचली आणि बरं वाटलं.. अशा कामांबद्दल सरकारचे अभिनंदन आणि श्रीधर ला पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा !

Saturday, January 19, 2008

हार्दिक अभिनंदन

ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत जाउन पराभव करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन !!!

Saturday, December 22, 2007

कोकण - पुन्हा एकदा !!

गेल्या शनिवारी कोकणात भटकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. मे महिन्यात सिंधुदुर्गाच्या सफरीचा बेत यशस्वी झाल्यानंतर या वेळी रत्नागिरीची सफर योजीली होती. प्रचंड धमाल करत हेदवी, हर्णे, आंजर्ले, केळशी, दाभोळ, दिवेआगर, दिघी, जंजिरा इत्यादी ठिकाणे मनसोक्त फिरून झाली. कोकणातील जेवण, उकडीचे मोदक, फेरीबोटीचा प्रवास अशा कितीतरी गोष्टींमुळे ही सफर अविस्मरणीय ठरली. अशा ठिकाणी भटकायला मिळाल्यामुळे आमचा भटकता आत्मा तृप्त झाला. यातील काही आठवणी चित्ररुपात खाली देत आहे.





Thursday, November 08, 2007

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! बऱ्याच दिवसांपासून इथे कुठलाही नवीन लेख लिहायला वेळ मिळाला नव्हता आता दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे

ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच शुभेच्छा

Friday, August 24, 2007

आनंदी आनंद गडे

जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे !

हिमालयातुन परतलो, सोबत खुप काय काय घेउन . नवा जोश, उर्मी, उस्ताह भरभरुन वाहतोय. ह्म्म्म्म, सगळं कसं शांत निवांत प्रसन्न वाटतंय. खुप काही आहे लिहिण्यासारखं. लिहिणं सुरु आहे, लवकरच पुर्ण होईल ...

Wednesday, August 08, 2007

हिमालयाकडे ...

सह्याद्रीच्या कुशीतुन फिरत असतांनाच बदल म्हणुन हिमालयाच्या कुशीत जाण्याचे ठरवले आहे. या वर्षी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चा बेत असुन पुढे जाउन गंगोत्री, तपोवन, आणि एवरेस्ट बेस कॅंप (बेडकाची उडी कुंपणापर्यंत :)) अशा योजना आहेत . परवा हिमालयाच्या दिशेने कूच करणार असुन पुढचे दहा दिवस हिमालयाच्या सानिद्ध्यातच घालवणार आहोत .. तेव्हा भेटूया ...

Thursday, July 26, 2007

पुरंदर - पुन्हा एकदा !!

काही दिवसांपुर्वी पुरंदरला पुन्हा एकदा भेट देण्याचा योग आला. त्यावेळचे काही क्षण



दिवे घाट

नभ उतरु आलं
वीर मुरारबाजी देशपांडे

पुरंदर आणि मागे वज्रगड

आषाढस्य प्रथम दिवसे

Monday, July 09, 2007

कोडे : सुटकेचा अजब मार्ग

चला , आज एक कोडे घालतो...

एका आटपाट नगरात एकदा चार दरोडेखोरांनी मिळून दरोडा घातला. त्या नगराचे गृहमंत्री आपल्या आर. आर. आबांसारखेच कर्तव्यतत्पर होते, त्यामुळे त्यांच्या खात्याने तीच तत्परता दाखवून त्या चोरांना पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीश महाराज आपल्या मुंबई बाँबस्फोट, मुंद्राक घोटाळा या सारख्या निवडक खटल्यांमध्ये अडकले होते. आणि तशीही या चोराकडून दंड म्हणून २५० वैगरे कोटी मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सरळ या चोरांना सोडून द्यायचे ठरवले. पण तसे केले असते तर वृत्तवाहिन्यांनी आठवडाभर भंडावुन सोडले असते, असा विचार करून न्यायाधीशांनी त्या चोरांना एक कोडे घातले. जर त्या चोरांनी कोडे सोडवले तर त्यांना सोडून देण्यात येईल (आणि मिडियाला सुद्धा आडवे करता येईल, इतकी हुशार मंडळी तुरुंगात का ठेवायची असे म्हणून) आणि जर त्यांनी कोडे सोडवले नाही तर मात्र त्यांना पकडून तिहारला पाठवण्यात येईल अशी घोषणा झाली.

ते कोडे खालील प्रमाणे होते. सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे चार कैद्यांना उभे करण्यात आले.

ते सर्वजण एकाच दिशेला बघत होते. त्यांना अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की

पहिला चोर, दुसऱ्या आणि तिसऱ्याला बघू शकतो
दुसरा चोर, तिसऱ्याला बघू शकतो
तिसरा आणि चौथा मात्र कुणालाही बघू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी ठेवण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते की एकूण दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या टोप्या आहेत. प्रत्येक जणाला तो स्वतः कुठल्या रंगाची टोपी घालत आहे हे माहिती नाही. आणि त्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या डोक्यावर कुठल्या रंगाची टोपी आहे ते ओरडून सांगायचे. कुणाही एकाने असे अचूक ओरडले तरी सर्वांची सुटका होणार. अर्थात या साठी नेहमीचे नियम लागू होतेच ते म्हणजे

कुणीही वळून बघायचे नाही किंवा हालचाल करायची नाही
एकमेकांशी बोलायचे नाही
डोक्यातून टोपी काढायची नाही

आता आपल्या सारख्या विद्वत जनांना प्रश्न असा आहे की कोण आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ?























उत्तर प्रतिसादात मिळेल :-)

Monday, July 02, 2007

साद सह्याद्रीची !

शनिवारी राजाशिवाजी.कॉम या संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला जाण्याचा योग आला. प्रदर्शनातून फिरताना तीन-चार तास कसे गेले ते सुद्धा कळले नाही. फार मेहनत करून हा खजिना आपल्यासाठी खुला करण्यात आला होता. याच प्रदर्शनाच्या वेळी ऋषितुल्य श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे सुद्धा दर्शन घडले.

अनेक किल्ल्यांनी आता छायाचित्रामधून साद घातली आहे.. बघूया कधी कधी कुठे कुठे जायला जमतेय ते !!

Saturday, June 23, 2007

'आमची माती, आमची माणसं'

आज कुठेतरी वाचनात 'आमची माती, आमची माणसं' या दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाचा उल्लेख आला, आणि दुरवरुन 'ती' धून ऐकू येते आहे असे वाटून गेले क्षणभर.

संध्याकाळी साडेसहा वाजता दूरदर्शन वर हा कार्यक्रम लागत असे. अर्थात त्यावेळी त्यातील चर्चा आणि संबंधित गोष्टींमध्ये विशेष रस नसायचा. तरी तुळशीला पाणी घालणारी माउली, शेत नांगरणारे शेतकरी (अगदी मागे उडणाऱ्या बगळ्यासहित) , दूध काढतानाचे शेतकरी या सगळ्या आसपास नेहमी दिसणाऱ्या गोष्टी टी. व्ही. च्या पडद्यावर बघताना पाहुन विशेष आनंद होत असे. या सर्वाच्या सोबतीला "ही काळी आई, धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणसं!." हे मस्त शिर्षकगीत अजूनच मोहिनी टाकत असे. या कार्यक्रमातून तज्ञांच्या मुलाखती सोबतच एखादा वेगळा प्रयोग केलेला शेतकरी मुलाखत देऊन जाई. अशा मुलाखती तर आम्ही हरखून पाहत असू.

आता या सर्वांचा विचार करताना असे वाटून जाते, की काय होते या कार्यक्रमात विशेष आवडावे असे, काहीही नाही. भरजरी साड्या आणि लक्झरी गाड्या नव्हत्या, मोठमोठ्या बिझनेस हाउस मधील भांडण नव्हती, विवाह बाह्य संबंध नव्हते की आचरट विनोद नव्हते. 'सो कॉल्ड' रियालिटी शो मधील एस.एम.एस. नव्हते की एकजात सारख्याच दिसणाऱ्या सिक्कीम मधील मुलीने तोडक्यामोडक्या हिंदीत बोलून खोलेलेले 'सुपर लोटो किस्मत के पिटारे नव्हते'. पण तरीही हा कार्यक्रम का लक्षात राहावा बरं?

ह्म्म !! त्याच्या नावातच या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. 'आमची माती आमची माणसं' या दोनच गोष्टीत जीवनाचं सारं आहे, आपल्याला सर्वात जास्त सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या आणि अभिमान वाटाव्या अशा या दोनच गोष्टी 'आमची माती आमची माणसं' !!

Thursday, June 21, 2007

दिसामाजी काहीतरी

गेल्या काही दिवसात काहीतरी चांगले वाचायला मिळाले. स्वतःला पुनर्प्रत्ययाचा आनंद आणि वाचकांना इथे आल्याचा आनंद (;-)) मिळावा म्हणून

१. जिद्दीच्या संदर्भातील सुंदर शेर
फलक को चाह है जहा बिजलिया गिराने की,
हममे भी ज़िद है, वही आशियां बनायेंगे । (फलक: आकाश)
****************************
२. दोन खळखळून हसवून गेलेले विनोद:

पहिला पुणेरी(दुसर्‍याला फोन करून) : 'देशपांडे' आहेत का?

दुसरा पुणेरी(चिडून): नाही पावनखिंडीत लढायला गेलेत, काही काम होतं का?

प.पू.:काही नाही त्यांना सांगा राजे गडावर पोहोचले आता मरायला हरकत नाही !!

****************************
पुण्यातील DSK विश्वच्या जाहिरातीतील 'घराला घरपण देणारी माणसं' हे वाक्य बघुन एका वखारवाल्याने आपल्या दुकानावर 'घराला सरपण देणारी माणसं' असा बोर्ड लावला

****************************
३. वसंत बापटांची सह्याद्रीवरील कविता
भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यारा मला हे कभिन्न कातळ ,प्यारा मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यारा मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला

४. एका वाक्यातील हास्य
@ पोट पाठी लागतं, म्हणून तर येवढी धावपळ
@ मनावर ताण कमी करायचाय, 'ताणून' द्या
@ अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, 'लिप्ट' ने जा
@ काळजी करण्यापेक्षा काळजी 'घेणं' चांगलं
@ शब्द शोधावे लागणं हा कवीचा पराभव, आणि अर्थ शोधावे लागणं हा काव्याचा
@ दारू पिऊन गाडी चालवायला मनाई असते ना, मग बार बाहेर पार्किंगची जागा कशाला
@आयुष्य हे नदी सारखं आहे, थांबलं की डबकं

Tuesday, June 19, 2007

आज उतनी भी नही बची

"आज उतनी भी नही बची ..."

हातात प्रिंट आउट घेऊन समोरच्या बोर्डाकडे बघत असतानाच विचारांची रेल्वे मनातून धावून गेली. प्रिंट समोरच्या बोर्डावर लावावी म्हणून ड्रॉवर उघडला, आणि नेहमी हव्या तेवढ्या पिन्स उपलब्ध असणाऱ्या ड्रॉवर मध्ये एकही पिन नव्हती. का कुणास ठाऊक पण चटकन मनात हाच शेर आला,

आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे,
जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे ।

आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे.

त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत.

असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.

खूप खूप लिहिता येईल,
..पण पुन्हा केव्हा तरी,

तूर्तास मात्र हातात कागद आहे आणि दुसरीकडे पिन शोधतो आहे ,
त्या न सापडणाऱ्या पिन ने सुद्धा टोचण्याचा धर्म पाळला हे मात्र नक्की...
आह !!

Tuesday, June 12, 2007

विडंबन - या बायडीस माझ्या

खरं तर 'या झोपडीत माझ्या' ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता 'या झोपडीत माझ्या' या दुव्यावर वाचता येऊ शकेल.

खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥

खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥

खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥

खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥

पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥

खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

- सुभाष डिके (कुल)

Tuesday, June 05, 2007

आईचे डोळे

आईचे डोळे [लेखक: प्रविण दवणे (धन्यवाद स्नेहा :-))]

आत्ताच एका मेल मधुन हा लेख मिळाला, आणि सहजच वाचायला सुरुवात केली. लेख वाचुन कधी संपला कळले नाही आणि संपला तेंव्हा शब्द निघाला नाही मुखातून. असा खुपंच सुरेख लेख सर्वांपर्यंत पोहचावा या विचाराने हा लेख इथे देतोय .





Saturday, June 02, 2007

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

१ जानेवारी २००७ ला आलेली संदिपची ही कविता मला फार आवडली होती

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची पुरे झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे
छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवून
कधीतरी सूर्यावर जळायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवून
कशासाठी सजायचे चापुन चोपून?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबू कधी म्हणायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
विळिपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारेधारेने चिरावी !
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पुर्णबिंब तगायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
मनातल्या माकडाशी हात मिळवून
आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोंबुनीय हाती येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधी राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्याची चाल दैवासारखी फेगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
स्वतःला विकून काय घेशील विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती?
स्वतःच नवे काहीतरी शोधायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
तेच तेच पाणी तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजून आहे, रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला हवे ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
नको बघू पाठीमागे, येईल कळून
कितीतरी करायचे गेले राहून
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधी माफ करायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

-संदिप खरे !!!

Wednesday, May 30, 2007

या झोपडीत माझ्या

काही दिवसांपुर्वी एका मित्राने ही कविता तालासुरात म्हणुन दाखवली होती, तेंव्हा पासुन शब्दांच्या शोधात होतो, आता मिळाले. एक नितांत सुंदर कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

जाता तया महाला, "मज्जाव" शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ६ ॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥ ७ ॥

- संत तुकडोजी महाराज

Monday, May 28, 2007

जयोस्तुते


भारतीय स्वातंत्रलढ्यातील द्रष्टा महापुरुष, आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा

Tuesday, May 22, 2007

'एक डाव भटाचा'

या रविवारी बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडला होता त्यामुळे आता मिळेल ते नाटक बघावे असे ठरवुन बालगंधर्व ला गेलो आणि 'एक डाव भटाचा' हे नाटक बघितले.

या नाटकाला म.टा. सन्मान पुरस्कार मिळाल्याचे ऐकले होते, तेंव्हा साहजिकच उत्सुकता होती. नाटक चांगले होते,पण तरिही अपेक्षेपेक्षा जरा कमीच. काही विनोद खळखळून हसवणारे होते, संवादातुन कोट्या आणि प्रासंगिक विनोद यांचा उत्तर वापर केला होता. पण तरिही द्वैअर्थी संवादाची लयलुट असल्याने नाटक मनातुन उतरत गेले. एकुणच अशा संवादा शिवाय विनोद निर्मिती होउच शकत नाही असा लेखकाचा गैरसमज दिसला. काही काही जागा मात्र हमखास हसवुन गेल्या. सर्वच कलाकारांचा अभिनय आवडला, विशेषतः 'बबन' नावाची व्यक्तिरेखा साकारणार्‍या तरुणात मस्त रंग भरला. दुसरिकडे तांत्रिक बाबतील काही चुका टाळता येउ शकल्या असत्या. दोन प्रवेशाच्या मध्ये विंगेतला मोठा दिवा सुरूच ठेवल्यामुळे रंगमंचावर केल्या जाणार्‍या गोष्टी प्रेक्षकांना दिसत होत्या. एकुणच नाटक 'ठीक' या सदरातील होते, पण पुरस्कार वैगरे मिळवण्यासारखे तर नक्किच नाही वाटले. सहकुटूंब वैगरे बघण्यासारखे नाही पण टाइमपास म्हणुन एकट्यानेमित्रांसोबत बघण्यासाठी बरे आहे.

(अर्थात मी एकटाच गेलो होतो !! :-)).