Saturday, December 22, 2007

कोकण - पुन्हा एकदा !!

गेल्या शनिवारी कोकणात भटकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. मे महिन्यात सिंधुदुर्गाच्या सफरीचा बेत यशस्वी झाल्यानंतर या वेळी रत्नागिरीची सफर योजीली होती. प्रचंड धमाल करत हेदवी, हर्णे, आंजर्ले, केळशी, दाभोळ, दिवेआगर, दिघी, जंजिरा इत्यादी ठिकाणे मनसोक्त फिरून झाली. कोकणातील जेवण, उकडीचे मोदक, फेरीबोटीचा प्रवास अशा कितीतरी गोष्टींमुळे ही सफर अविस्मरणीय ठरली. अशा ठिकाणी भटकायला मिळाल्यामुळे आमचा भटकता आत्मा तृप्त झाला. यातील काही आठवणी चित्ररुपात खाली देत आहे.





Thursday, November 08, 2007

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! बऱ्याच दिवसांपासून इथे कुठलाही नवीन लेख लिहायला वेळ मिळाला नव्हता आता दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे

ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच शुभेच्छा

Friday, August 24, 2007

आनंदी आनंद गडे

जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे !

हिमालयातुन परतलो, सोबत खुप काय काय घेउन . नवा जोश, उर्मी, उस्ताह भरभरुन वाहतोय. ह्म्म्म्म, सगळं कसं शांत निवांत प्रसन्न वाटतंय. खुप काही आहे लिहिण्यासारखं. लिहिणं सुरु आहे, लवकरच पुर्ण होईल ...

Wednesday, August 08, 2007

हिमालयाकडे ...

सह्याद्रीच्या कुशीतुन फिरत असतांनाच बदल म्हणुन हिमालयाच्या कुशीत जाण्याचे ठरवले आहे. या वर्षी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चा बेत असुन पुढे जाउन गंगोत्री, तपोवन, आणि एवरेस्ट बेस कॅंप (बेडकाची उडी कुंपणापर्यंत :)) अशा योजना आहेत . परवा हिमालयाच्या दिशेने कूच करणार असुन पुढचे दहा दिवस हिमालयाच्या सानिद्ध्यातच घालवणार आहोत .. तेव्हा भेटूया ...

Thursday, July 26, 2007

पुरंदर - पुन्हा एकदा !!

काही दिवसांपुर्वी पुरंदरला पुन्हा एकदा भेट देण्याचा योग आला. त्यावेळचे काही क्षण



दिवे घाट

नभ उतरु आलं
वीर मुरारबाजी देशपांडे

पुरंदर आणि मागे वज्रगड

आषाढस्य प्रथम दिवसे

Monday, July 09, 2007

कोडे : सुटकेचा अजब मार्ग

चला , आज एक कोडे घालतो...

एका आटपाट नगरात एकदा चार दरोडेखोरांनी मिळून दरोडा घातला. त्या नगराचे गृहमंत्री आपल्या आर. आर. आबांसारखेच कर्तव्यतत्पर होते, त्यामुळे त्यांच्या खात्याने तीच तत्परता दाखवून त्या चोरांना पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीश महाराज आपल्या मुंबई बाँबस्फोट, मुंद्राक घोटाळा या सारख्या निवडक खटल्यांमध्ये अडकले होते. आणि तशीही या चोराकडून दंड म्हणून २५० वैगरे कोटी मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सरळ या चोरांना सोडून द्यायचे ठरवले. पण तसे केले असते तर वृत्तवाहिन्यांनी आठवडाभर भंडावुन सोडले असते, असा विचार करून न्यायाधीशांनी त्या चोरांना एक कोडे घातले. जर त्या चोरांनी कोडे सोडवले तर त्यांना सोडून देण्यात येईल (आणि मिडियाला सुद्धा आडवे करता येईल, इतकी हुशार मंडळी तुरुंगात का ठेवायची असे म्हणून) आणि जर त्यांनी कोडे सोडवले नाही तर मात्र त्यांना पकडून तिहारला पाठवण्यात येईल अशी घोषणा झाली.

ते कोडे खालील प्रमाणे होते. सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे चार कैद्यांना उभे करण्यात आले.

ते सर्वजण एकाच दिशेला बघत होते. त्यांना अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की

पहिला चोर, दुसऱ्या आणि तिसऱ्याला बघू शकतो
दुसरा चोर, तिसऱ्याला बघू शकतो
तिसरा आणि चौथा मात्र कुणालाही बघू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी ठेवण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते की एकूण दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या टोप्या आहेत. प्रत्येक जणाला तो स्वतः कुठल्या रंगाची टोपी घालत आहे हे माहिती नाही. आणि त्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या डोक्यावर कुठल्या रंगाची टोपी आहे ते ओरडून सांगायचे. कुणाही एकाने असे अचूक ओरडले तरी सर्वांची सुटका होणार. अर्थात या साठी नेहमीचे नियम लागू होतेच ते म्हणजे

कुणीही वळून बघायचे नाही किंवा हालचाल करायची नाही
एकमेकांशी बोलायचे नाही
डोक्यातून टोपी काढायची नाही

आता आपल्या सारख्या विद्वत जनांना प्रश्न असा आहे की कोण आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ?























उत्तर प्रतिसादात मिळेल :-)

Monday, July 02, 2007

साद सह्याद्रीची !

शनिवारी राजाशिवाजी.कॉम या संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला जाण्याचा योग आला. प्रदर्शनातून फिरताना तीन-चार तास कसे गेले ते सुद्धा कळले नाही. फार मेहनत करून हा खजिना आपल्यासाठी खुला करण्यात आला होता. याच प्रदर्शनाच्या वेळी ऋषितुल्य श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे सुद्धा दर्शन घडले.

अनेक किल्ल्यांनी आता छायाचित्रामधून साद घातली आहे.. बघूया कधी कधी कुठे कुठे जायला जमतेय ते !!

Saturday, June 23, 2007

'आमची माती, आमची माणसं'

आज कुठेतरी वाचनात 'आमची माती, आमची माणसं' या दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाचा उल्लेख आला, आणि दुरवरुन 'ती' धून ऐकू येते आहे असे वाटून गेले क्षणभर.

संध्याकाळी साडेसहा वाजता दूरदर्शन वर हा कार्यक्रम लागत असे. अर्थात त्यावेळी त्यातील चर्चा आणि संबंधित गोष्टींमध्ये विशेष रस नसायचा. तरी तुळशीला पाणी घालणारी माउली, शेत नांगरणारे शेतकरी (अगदी मागे उडणाऱ्या बगळ्यासहित) , दूध काढतानाचे शेतकरी या सगळ्या आसपास नेहमी दिसणाऱ्या गोष्टी टी. व्ही. च्या पडद्यावर बघताना पाहुन विशेष आनंद होत असे. या सर्वाच्या सोबतीला "ही काळी आई, धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणसं!." हे मस्त शिर्षकगीत अजूनच मोहिनी टाकत असे. या कार्यक्रमातून तज्ञांच्या मुलाखती सोबतच एखादा वेगळा प्रयोग केलेला शेतकरी मुलाखत देऊन जाई. अशा मुलाखती तर आम्ही हरखून पाहत असू.

आता या सर्वांचा विचार करताना असे वाटून जाते, की काय होते या कार्यक्रमात विशेष आवडावे असे, काहीही नाही. भरजरी साड्या आणि लक्झरी गाड्या नव्हत्या, मोठमोठ्या बिझनेस हाउस मधील भांडण नव्हती, विवाह बाह्य संबंध नव्हते की आचरट विनोद नव्हते. 'सो कॉल्ड' रियालिटी शो मधील एस.एम.एस. नव्हते की एकजात सारख्याच दिसणाऱ्या सिक्कीम मधील मुलीने तोडक्यामोडक्या हिंदीत बोलून खोलेलेले 'सुपर लोटो किस्मत के पिटारे नव्हते'. पण तरीही हा कार्यक्रम का लक्षात राहावा बरं?

ह्म्म !! त्याच्या नावातच या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. 'आमची माती आमची माणसं' या दोनच गोष्टीत जीवनाचं सारं आहे, आपल्याला सर्वात जास्त सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या आणि अभिमान वाटाव्या अशा या दोनच गोष्टी 'आमची माती आमची माणसं' !!

Thursday, June 21, 2007

दिसामाजी काहीतरी

गेल्या काही दिवसात काहीतरी चांगले वाचायला मिळाले. स्वतःला पुनर्प्रत्ययाचा आनंद आणि वाचकांना इथे आल्याचा आनंद (;-)) मिळावा म्हणून

१. जिद्दीच्या संदर्भातील सुंदर शेर
फलक को चाह है जहा बिजलिया गिराने की,
हममे भी ज़िद है, वही आशियां बनायेंगे । (फलक: आकाश)
****************************
२. दोन खळखळून हसवून गेलेले विनोद:

पहिला पुणेरी(दुसर्‍याला फोन करून) : 'देशपांडे' आहेत का?

दुसरा पुणेरी(चिडून): नाही पावनखिंडीत लढायला गेलेत, काही काम होतं का?

प.पू.:काही नाही त्यांना सांगा राजे गडावर पोहोचले आता मरायला हरकत नाही !!

****************************
पुण्यातील DSK विश्वच्या जाहिरातीतील 'घराला घरपण देणारी माणसं' हे वाक्य बघुन एका वखारवाल्याने आपल्या दुकानावर 'घराला सरपण देणारी माणसं' असा बोर्ड लावला

****************************
३. वसंत बापटांची सह्याद्रीवरील कविता
भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यारा मला हे कभिन्न कातळ ,प्यारा मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यारा मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला

४. एका वाक्यातील हास्य
@ पोट पाठी लागतं, म्हणून तर येवढी धावपळ
@ मनावर ताण कमी करायचाय, 'ताणून' द्या
@ अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, 'लिप्ट' ने जा
@ काळजी करण्यापेक्षा काळजी 'घेणं' चांगलं
@ शब्द शोधावे लागणं हा कवीचा पराभव, आणि अर्थ शोधावे लागणं हा काव्याचा
@ दारू पिऊन गाडी चालवायला मनाई असते ना, मग बार बाहेर पार्किंगची जागा कशाला
@आयुष्य हे नदी सारखं आहे, थांबलं की डबकं

Tuesday, June 19, 2007

आज उतनी भी नही बची

"आज उतनी भी नही बची ..."

हातात प्रिंट आउट घेऊन समोरच्या बोर्डाकडे बघत असतानाच विचारांची रेल्वे मनातून धावून गेली. प्रिंट समोरच्या बोर्डावर लावावी म्हणून ड्रॉवर उघडला, आणि नेहमी हव्या तेवढ्या पिन्स उपलब्ध असणाऱ्या ड्रॉवर मध्ये एकही पिन नव्हती. का कुणास ठाऊक पण चटकन मनात हाच शेर आला,

आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे,
जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे ।

आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे.

त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत.

असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.

खूप खूप लिहिता येईल,
..पण पुन्हा केव्हा तरी,

तूर्तास मात्र हातात कागद आहे आणि दुसरीकडे पिन शोधतो आहे ,
त्या न सापडणाऱ्या पिन ने सुद्धा टोचण्याचा धर्म पाळला हे मात्र नक्की...
आह !!

Tuesday, June 12, 2007

विडंबन - या बायडीस माझ्या

खरं तर 'या झोपडीत माझ्या' ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता 'या झोपडीत माझ्या' या दुव्यावर वाचता येऊ शकेल.

खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥

खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥

खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥

खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥

पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥

खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

- सुभाष डिके (कुल)

Tuesday, June 05, 2007

आईचे डोळे

आईचे डोळे [लेखक: प्रविण दवणे (धन्यवाद स्नेहा :-))]

आत्ताच एका मेल मधुन हा लेख मिळाला, आणि सहजच वाचायला सुरुवात केली. लेख वाचुन कधी संपला कळले नाही आणि संपला तेंव्हा शब्द निघाला नाही मुखातून. असा खुपंच सुरेख लेख सर्वांपर्यंत पोहचावा या विचाराने हा लेख इथे देतोय .





Saturday, June 02, 2007

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

१ जानेवारी २००७ ला आलेली संदिपची ही कविता मला फार आवडली होती

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची पुरे झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे
छोटे मोठे दिवे फुंकरीने मालवून
कधीतरी सूर्यावर जळायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवून
कशासाठी सजायचे चापुन चोपून?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबू कधी म्हणायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
विळिपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारेधारेने चिरावी !
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पुर्णबिंब तगायला हवे ! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
मनातल्या माकडाशी हात मिळवून
आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोंबुनीय हाती येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधी राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्याची चाल दैवासारखी फेगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
स्वतःला विकून काय घेशील विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती?
स्वतःच नवे काहीतरी शोधायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
तेच तेच पाणी तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजून आहे, रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला हवे ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
नको बघू पाठीमागे, येईल कळून
कितीतरी करायचे गेले राहून
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधी माफ करायला हवे! ... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

-संदिप खरे !!!

Wednesday, May 30, 2007

या झोपडीत माझ्या

काही दिवसांपुर्वी एका मित्राने ही कविता तालासुरात म्हणुन दाखवली होती, तेंव्हा पासुन शब्दांच्या शोधात होतो, आता मिळाले. एक नितांत सुंदर कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

जाता तया महाला, "मज्जाव" शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ६ ॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥ ७ ॥

- संत तुकडोजी महाराज

Monday, May 28, 2007

जयोस्तुते


भारतीय स्वातंत्रलढ्यातील द्रष्टा महापुरुष, आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा

Tuesday, May 22, 2007

'एक डाव भटाचा'

या रविवारी बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडला होता त्यामुळे आता मिळेल ते नाटक बघावे असे ठरवुन बालगंधर्व ला गेलो आणि 'एक डाव भटाचा' हे नाटक बघितले.

या नाटकाला म.टा. सन्मान पुरस्कार मिळाल्याचे ऐकले होते, तेंव्हा साहजिकच उत्सुकता होती. नाटक चांगले होते,पण तरिही अपेक्षेपेक्षा जरा कमीच. काही विनोद खळखळून हसवणारे होते, संवादातुन कोट्या आणि प्रासंगिक विनोद यांचा उत्तर वापर केला होता. पण तरिही द्वैअर्थी संवादाची लयलुट असल्याने नाटक मनातुन उतरत गेले. एकुणच अशा संवादा शिवाय विनोद निर्मिती होउच शकत नाही असा लेखकाचा गैरसमज दिसला. काही काही जागा मात्र हमखास हसवुन गेल्या. सर्वच कलाकारांचा अभिनय आवडला, विशेषतः 'बबन' नावाची व्यक्तिरेखा साकारणार्‍या तरुणात मस्त रंग भरला. दुसरिकडे तांत्रिक बाबतील काही चुका टाळता येउ शकल्या असत्या. दोन प्रवेशाच्या मध्ये विंगेतला मोठा दिवा सुरूच ठेवल्यामुळे रंगमंचावर केल्या जाणार्‍या गोष्टी प्रेक्षकांना दिसत होत्या. एकुणच नाटक 'ठीक' या सदरातील होते, पण पुरस्कार वैगरे मिळवण्यासारखे तर नक्किच नाही वाटले. सहकुटूंब वैगरे बघण्यासारखे नाही पण टाइमपास म्हणुन एकट्यानेमित्रांसोबत बघण्यासाठी बरे आहे.

(अर्थात मी एकटाच गेलो होतो !! :-)).

Monday, May 14, 2007

तेरेखोल ते विजयदुर्ग : सफर सिंधुदुर्ग किनार्‍याची

कोकणातील तीन दिवस केलेला हा ट्रेक चुकू नये अशी मनोमन इच्छा होती, आणि त्या दृष्टीने सर्व 'तयारी' करुन या भ्रमंतीमध्ये मी सामील झालो. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर कोल्हापुरात एक थांबा घेउन पुढे जायचे असे ठरले होते, पण निघतांनाच उशीर झालेला असल्यामुळे कोल्हापुरातील थांबा रद्द करावा लागला. गगनबावडा हा बहुचर्चीत घाट उतरुन कोकणात शिरत असतांनाच कोकणच्या वैशिष्ट्यपुर्ण कोकण रेल्वेने आमचे जोरदार स्वागत केले. पुढे सागरेश्वराला पोहचल्यानंतर बराच उशीर झालेला होता तरिही समुद्राचा तो आवाज सर्वांनाच तिकडे खेचुन घेउन गेला.

रविवारी सकाळी अगोदर आम्ही तेरेखोल किल्ल्यावर पोहोचलो, पण तिकडे मिळालेल्या माहीतीनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत किल्ल्यात प्रवेश मिळणार नाही असे कळले. म्हणुन आम्ही आमचा मोर्चा यशवंतगडाकडे वळवला. पोहोचल्या बरोबर अमित नावाच्या एका व्यक्तीने स्वतःहुन किल्ला दाखवायला येतो असे सांगत आमच्या सोबत चालायला सुरुवात केली. किल्ला अपेक्षेपेक्षा फारच सुस्थितीत आहे. किल्ल्याची भव्यता आणि सध्याची स्थिती दर्शवणारे किल्याचे प्रवेशद्वार... किल्ल्यात शिरल्याबरोबर एकेकाळी या किल्ल्याने किती वैभव पाहिले असेल याची साक्ष मिळते. उंच उंच भिंती, त्यावरिल गवाक्ष, प्रशस्त खोल्या आणि मजबुत तटबंदी सगळे तसेच खिळवुन ठेवते. वर उल्लेख आल्याप्रमाणे झाडांची नक्षी हे सुद्धा वैशिष्ट्य्च. तटबंदीवरुन सागराचे दर्शन घेत आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चालत गेलो. यशवंतगडाकडुन पुन्हा आम्ही तेरेखोल कडे प्रयाण केले. हा किल्ला थेट महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवर आहे. या किल्ल्याच्या जवळच तेरेखोल नदी समुद्राला मिळते. या किल्ल्याचे खाजगीकरण झाल्यामुळे तो फक्त FORT TRICOL या नावात असलेल्या fort या शब्दातच किल्ला असल्याचे जाणवते, बाकी किल्ल्यात शिरल्यानंतर याचा काहिही पत्ता लागत नाही. पण वरच्या बुरुजातुन समुद्राचे अप्रतिम दृश्य मात्र दिसते. या किल्ल्याचे हवाई दर्शन तेरेखोल या लिंक वर मिळेल. तेरेखोल कडुन परत आम्ही रेडीच्या जवळ पाषाणातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी निघालो, रस्त्याने मिठागरे सुद्धा बघायला मिळाली. वैशिष्ठ्यपुर्ण मुर्तीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, अर्थात आता रंगाचे मनसोक्त वापर केला गेल्यामुळे मुळ मुर्तीचे सौंदर्य नष्ट होते चालले आहे, पण तरिही छान दिसते. गणपती समोर असलेला उंदिरमामाही तितकाच मोहक.

पुढचे लक्ष होते किल्ले निवती. वाटेत मनसोक्त रानमेव्याचा आस्वाद लुटता आला. फार कमी ट्रेक मध्ये हे सुख नशिबात येतं, आणि या वेळी तर सर्वच प्रकारचा मेवा हाताने तोडुन खाता आला. पुढे किल्ले निवती कडे जाताना रस्ता चुकलो आणि निवतीच्या बीच वर येउन पोहोचलो. पुन्हा अनेक लोकांना विचारत, आणि शेवटी एका पोलीस स्टेशन मध्ये खात्री करुन घेत आम्ही एकदाचे किल्ले निवतीच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. आता मात्र चालावे लागेल असा विचार मनात करत असतांनाच आम्ही किल्ल्यावर सुद्धा पोहोचलो. तुरळक ठिकाणी दिसणारी तटबंदी आणि संरक्षणार्थ बांधलेल खोल खंदक हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. तसेच समोर समुद्रातुन उगवल्यासारखे दिसणारे खडक आणि शेजारचा नितळ शब्दाचा खराखुरा अर्थ सांगणारा भोगवेचा किनारा, तासन तास तिकडे बसुन रहावं असं ते दृश्य आम्ही डोळ्यात साठवत होतो. आलो नसतो तर हे सगळे miss झाले असते, म्हणुन आता आल्याबद्दल बरे वाटत होते आणि 'जे' येउ शकले नाहीत त्यांची हमखास आठवण आली. किल्ला बघुन झाल्यावर परतत असतांना लाल मुगळ्यांनी झाडाच्या कोवळ्या पानापासुन बनवलेली विशेष घरे बघायला मिळाली.

किल्ले निवती आणि परिसर या लिंक वर निवतीच्या किल्याचा प्रदेश बघता येइल त्यासोबतच उत्तरेकडील सुंदर किनारा सुद्धा न्याहाळता येईल.

पहिल्याच अर्ध्या दिवसातच डोळे खुष होउन गेले होते, पण पोटात मात्र जोरदार ओरड सुरु होती. मग मालवणात पोहोचल्यानंतर बऱ्याच लोकांना विचारुन चैतन्य नावाच्या हॉटेल मध्ये प्रवेश केला, छोट्याश्या त्या हॉटेल मधे अस्सल मालवणी जेवणावर आडवा हात मारला आणि समाधान वाटले. एवढ्याश्या त्या हॉटेल मधे एक छोटीशी विहिर सुद्धा आहे. एकुणच कोकणातल्या विहीरी एकदम छोट्या छोट्या असतात हे वाचले होते आता प्रत्यक्ष पाहिले. काही विहिरी तर मोठे ताट झाकण म्हणुन ठेवता येतील अश्या असतात.

आता लक्ष होते सिंधुदुर्ग. मालवणच्या जवळच कुरटे बेटाकडे महाराजांचे लक्ष गेले आणि सिंधुसागर धन्य झाला. समुद्रावर आपला वचक बसवण्यासाठी त्या भागात सागरी दुर्गाची गरज राजांनी जाणली, आणि गोड पाणी उपलब्ध असणाऱ्या कुरटे बेटावर किल्ला वसविण्याची त्यांनी आज्ञा दिली. शिसे, चुना आणि गुळ यांचा वापर करुन या गडाचा पाया भरण्यात आला. एकुण साडेतीन कि.मी. एवढ्या तटबंदीच्या आत या गडाचा पसारा सामवलेला आहे. भक्कम तटबंदी आजही सागराच्या रौद्र रुपाला सामर्थ्याने तोंड देत उभी आहे. वळणाकृती प्रवेश्द्वाराने आम्ही किल्ल्यात प्रवेश केला, आणि समोरच एक दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर दिसले. मारुतीच्या समोरच गडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यात वरच्या बाजुला काही रिकाम्या जागा दिसतात. शत्रु आत शिरण्याचा प्रयत्न करत असल्यास गरम तेल सोडण्यासाठी त्याचा उपयोग गेला जातो. गडावर काही खाजगी घरे आहेत, पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार परवानगी घेतल्याशिवाय गडावर मुक्कामाला रहाता येत नाही. प्रवेशद्वारापासुन एक सिमेंटचा रस्ता शिवाजी राजांच्या मंदिराकडे घेउन जातो. याच रस्त्यावर डाव्याबाजुला प्रसिद्ध दोन फांद्याचा माड आहे. पुढे शिवाजी राजांचे मंदिर आहे. कोल्हापुरच्या महाराजांकडुन या मंदिराची देखभाल करण्यात येते. आत कोळ्याच्या वेशात असलेल्या शिवप्रभुंची मुर्ती आहे. तसेच राजांची एक तलवार सुद्धा ठेवलेली आहे. दसऱ्याच्या दिवशी ही तलवार बाहेर काढली जाते. अशा मंगल वातावरणात छत्रपतींच्या नावाने गर्जना होणारच, या गर्जनेत पुजारी आणि इतर मंडळी सुद्धा सहभागी झाली. मंदिराच्या डाव्या बाजुने पुढे जावुन भवानी मातेचे दर्शन घेतले आणि मग तटबंदी वरुन चालायला सुरुवात केली. खाली समुद्र तटबंदीवर जोरदार लाटांनी प्रहार करत होता आणि त्या संगमातुन उसळणारे पाणी डोळे मिटू देत नव्हते. पुढे चालत गेल्यानंतर तटबंदीच्या बाहेरुन वाळुचा एक पट्टा दिसतो. हाच भाग राणीच्या वेळा म्हणुन प्रसिद्ध आहे. महाराणी ताराबाई यांच्या वेळी हा भाग वापरात आला.
सिंधुदुर्ग या लिंकवरुन सिंधुदुर्गाचे दर्शन घेता येईल.
याच लिंकवरुन एक आणखी गोष्ट लक्षात येईल. महाराजांनी किल्ला वसवण्याचा विचार करतांना एका गोष्टीने त्यांचा निर्णय पक्का केला होता. ती गोष्ट म्हणजे या बेटाचा आसपास भरपुर खडक आहेत, आणि या कारणामुळे कुठलेही मोठे जहाज गडाच्या थेट जवळ येउ शकत नाही आजही छोट्या यांत्रिक बोटी एक वळसा घेउनच आत आणतात. मात्र बेटावर उभे राहिले असता ही गोष्ट लगेच लक्षात येत नाही. या लिंकवरच्या चित्रात मात्र ते खडक स्पष्ट दिसतात.

परत फिरत असतांना तटंबदित जपुन ठेवलेल्या राजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठश्यांचे दर्शन घेतले. एकुणच फार कमी गडांना राजांच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ झाला त्यामुळे अशा ठिकांणाचे महत्त्व वाढते. एक तासाच्या या भ्रमंती नंतर आम्ही परतीचा मार्ग धरला. मग तारकर्लीला जाउन समुद्रावरची शांत रात्र अनुभवली. तिकडे पंधरा वीस कोळी मिळुन एकाच भल्यामोठ्या जाळ्याला ओढत होते. मागे एम.टीड़ीसी च्या रिसॉर्टवर चौकशी केल्यानंतर कळले की ऑनलाईन बुकिंग करुनच तिकडे रहायला मिळू शकते. मग एका छोट्याश्या हॉटेल मध्ये जाउन पथारी टाकली. पत्त्याचा एक डाव मांडुन आणि तो 'जिंकुन' दिवसाची सांगता केली.

सोमवारी सकाळी तारकर्लीमध्ये समुद्रस्नानाचा बेत होता. तारकर्लीच्या समुद्र एवढा नितळ आहे की सुर्यप्रकाश आणि हवामान या गोष्टी जुळून आल्यातर २० फुटापर्यंत समुद्राचा तळ दिसु शकतो. आम्ही मात्र अगदी सकाळी गेल्यामुळे आम्हाला तसे काही बघायला मिळाले नाही. पण तरिही स्वच्छ समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटता आला. मागे अलिबागच्या किनाऱ्यावरुन फिरतांनाचे दिवस आठवले, नुसता किनारा बघुनच समुद्रात जाण्याची इच्छा होत नव्हती. तारकर्लीला मात्र तो उपवास धरावा लागला नाही. समुद्र खवळलेला होता आणि आम्हाला मात्र मोठ्या मोठ्या लाटांवर स्वार व्हायला फारच मज्जा येत होती. तारकर्लीचा किनारा हा एकदम सुरक्षित मानला जातो. मध्येच समुद्रातुन बाहेर येउन उन्हात वाळुवर पडुन रहावे, वाळुमध्ये पाय रोवुन घर बांधण्याचा थेट लहानपणात घेउन जाणारा खेळ खेळावा आणि परत समुद्रात जावे, असा बराच वेळ खेळ सुरु होता. पुढच्या दिवसभराच्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवुन आम्ही समुद्राचा निरोप घेतला आणि 'अन्नपुर्णा' हॉटेल मध्ये परतलो. अंघोळी आणि न्याहारी उरकुन परत आम्ही मालवणात दाखल झालो. राजकोट आणि सर्जेकोट बघुन आम्ही पद्मदुर्गाकडे निघालो. पुर्वी पद्मदुर्गाकडे जाण्यासाठी वाळुच्या पट्ट्यावरुन जाता येत असे पण त्सुनामी नंतर मात्र तो पट्टा नष्ट झाला आणि आता बोटीशिवाय पर्याय नाही. पद्मदुर्ग या लिंकवर पद्मदुर्ग आणि त्याकडे जाणारा वाळूचा दांडा स्पष्ट दिसत आहे. बोटिने पद्मदुर्ग गाठल्यावर आत देवाचे दर्शन घेतले आणि बाहेर पडताच वाळूकडे नजर गेली. तिकडे विविध प्रकारच्या अत्यंत सुंदर शंख शिंपल्याचा सडाच पडला होता. भान हरपुन सगळे जण शिंपले गोळा करायला धावले. परत बोटीने बसतांना प्रत्येकाची झोळी भरुन निघाली होती.

मालवणात परतुन पुढे मसुरे गावच्या जवळ असलेल्या भरतगडाकडे आम्ही निघालो. भरतगडाची तटबंदी आणि बुरुज अजुन शिल्लक व्यवस्थीत शिल्लक आहे . आडबाजुच्या या अशा किल्ल्यांकडे कुणाचे विशेष लक्ष नसल्यामुळे अशा किल्ल्यावरुन आधुनिक 'शिल्पकरांची कला' बघायला मिळत नाही ही त्यातल्यात्यात एक आनंदाची गोष्ट ! आत आंब्याची झाडी आहेत आणि एक खोल विहीर आहे. विहिरीत उतरुन जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पाणी सुद्धा व्यवस्थीत दिसते. विहीर बघुन आम्ही तटबंदिवरुन चालायला सुरुवात केली. एका बुरुजावर कसेबसे चढून दुरवर नजर टाकली, सर्वत्र निसर्गाच्या हिरवाईने परिसर नटलेला होता.

भरतगड उतरुन आम्ही गड नदिच्या किनाऱ्यावर आलो, या नदित समुद्राचे पाणी शिरुन तिचे खाडित रुपांतर झाले आहे. गाडीतुन उतरुन आम्ही किनाऱ्यावर आलो, आणि समोर दिसणाऱ्या दृश्याने सर्वांनाच खिळून ठेवले. दुरवर गेलेली खाडी, त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर दाटीवाटीने उभी असलेली माडाची गर्दी, सुर्य परतीच्या प्रवासाला निघालेला, एकदम शांत वातावरण, त्या शांततेचा भंग करणारे पण मधुर असे विविध पक्ष्यांचे आवाज, आणि या सर्व वातावरणात शांतपणे खाडी पार करत असलेली तर. केवळ चित्रात किंवा चित्रपटात दिसणारे हे दृश्य भरभरुन अनुभवायला मिळत होते. 'तर' या बाजुला आली आणि थोडेसे अंतर पुढे जात आम्ही जाउन बसलो. ट्रेकिंगच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या वाहनांनी एकेकदा प्रवास घडतो आहे, त्यात या तर चा सुद्धा समावेश झाला. खाडी ओलांडुन त्या गच्च झाडीत प्रवेश केला. भगवंतगडाकडे चालत निघालो. एक छोटेसे वळण घेउन आपण गडावर प्रवेश करतो, गडावर जात असतांना सभोवतालचे नयनरम्य दृश्य दिसतच होते आणि आत याच्या जोडीला पायथ्याखालच्या गावात सुरु असलेल्या पं. भिमसेन जोशी यांच्या स्वरातील अभंगवाणीचे स्वर सुद्धा आमच्या पर्यंत पोहोचत होते. त्या वातावरणात ते स्वर एकदम प्रसन्न करुन गेले. भगवंत गडावर एका देउळ आणि तुळशी वृंदावनाचे अवशेष शिल्लक आहेत आणि दरवाज्याचे काही अवशेष दिसतात. संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आम्हाला दर्शन घडले. आणि मागे आम्ही पार केलेली खाडी दिसत होती. आम्ही गडावरुन परतलो आणि तर वाल्यांना धन्यवाद देउन पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. भरतगड आणि भगवंतगड भरतगड, भगवंत गड आणि आजुबाजुचा परिसर.

आचऱ्याच्या पुरातन रामेश्वराकडे जात असतांना मध्येच एक मोठे देउळ दिसले आणि आम्ही दर्शन घ्यायला उतरलो. कांदळगाव असे त्या गावाचे नाव होते आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधला जात असतांना (कि पुर्वी ?) शिवाजी राजे कांदळगावाच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. देवळाच्या अगदी समोर राजांनीच लावलेला वटवृक्ष जतन केलेला आहे, त्याच्या खाली आता महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. एकुणच देउळ खुप प्रशस्त आणि प्रसन्न वाटले. कोकणात फिरतांना तिकडील देवळे मला फारच आवडली, कुठल्याही छोट्याश्या गावात छान बांधलेले देउळ दिसत होते. कौलारु सभामंडप , आत प्रशस्त जागा , आणि स्वच्छ परिसर सर्वच देवळातुन आढळतो. अजुन एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे, देशावर महादेवाच्या समोर नंदी काही अंतरावर किंवा बऱ्याचदा बाहेर असतो, पण कोकणात मात्र नंदी अगदी महादेवाच्या जवळ असतो आणि त्यामुळे नंदीपासुन काही हात दुरुनच दर्शन घ्यावे लागते. नंतर आचऱ्याच्या रामेश्वराचे दर्शन घेतले आणि जेवण करुन कुणकेश्वराकडे निघालो. कुणकेश्वराकडे जातांना शेवटच्या वळणावर दुरुन मोहक दर्शन होते. कुणकेश्वराला भक्त निवासाची चांगली सोय केलेली आहे. त्या भक्त निवासाच्या दोन खोल्या घेतल्या, पुन्हा एकदा गप्पांच्या जोडीने पत्त्याचा डाव रंगला, आणि अस्मादिकांनी परत एकदा डाव जिंकला !!

सकाळी उठुन कुणकेश्वराचे दर्शन घेतले, थोडावेळ समुद्राकडे बघत बसलो आणि मग देवगडाच्या दिशेने निघालो. वाटेत जामसंडे नावाचे गाव लागले. देवगडचा हापुस इथेच खरेदी केला जातो. मनसोक्त आंब्याची खरेदी करुन देवगडाच्या किल्ल्यात प्रवेश केला. आत एक अलिकडच्या बांदणीचे देउळ आहे आणि दिपगृह आहे. फुरश्यांसाठी एकेकाळी हा किल्ला अतिप्रसिद्ध होता पण आता मात्र फुरसे आजिबातच आढळत नाही. देवगडाचा निरोप घेउन आम्ही विजयदुर्गाकडे प्रस्थान केले. विजयदुर्गात पोहोचल्या नंतर पहिल्या नजरेतच आपण त्याच्या प्रेमात पडतो. बहुपदरी तटबंदी बाहेरुन स्पष्ट दिसते आणि किल्ल्याच भक्कम भिंत सुद्धा एका बुरुजावरुन दिसणारा भला मोठा तिरंगा बघत आपण आत प्रवेश करतो. इतर किल्ल्याप्रमाणे इथे सुद्धा वळण घेउनच प्रवेश घ्यावा लागतो. आत शिरल्यानंतर एक मारुतीचे मंदिर आहे आणि समोर एक पोलिस स्टेशन सुद्धा आहे. बाहेरच तोफेच गोळे मांडुन ठेवलेले दिसतात. नंतर तटबंदीवरुन चालयला सुरुवात केल्यानंतर आपल्याला तिची वैशिष्ट्ये लक्षात यायला लागतात. अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीची तिची बांधणी आहे.

याच्याही पुढे जाउन अलिकडेच लागलेल्या एका शोधाची माहिती आपल्याला स्तिमीत करते. इंग्रज काळात विजयदुर्ग जिंकण्यासाठी त्यांनी समुद्राच्या बाजुने हल्ला चढवण्याची योजना केली आणि या हल्ल्या साठी एक जहाज विजयदुर्गाकडे निघाले. पण विजयदुर्गापासुन काही अंतरावरच ते जहाज अत्यंत गुढ रित्या समुद्रात समाधिस्त झाले. या इतिहाचा पाठपुरावा करत काही लोकांनी पाणबुड्याच्या साह्याने विजयदुर्गाच्या आसपासचा सागर पिंजुन काढला आणि त्यांना सापडलेली माहिती आश्चर्यजनक होती. विजयदुर्गाच्या काही अंतर पुढे खोल समुद्रात एका खडकावर २० फुटापर्यंत तटबंदी बांधण्यात आलेली आहे आणि हे बांधकाम शिवकालीन आहे. या स्थ्यापत्यकले पुढे आणि कल्पकतेपुढे आपण नतमस्तक होतो आणि विजयदुर्ग हा 'विजय'दुर्ग होता ते लक्षात येते. विजयदुर्गावरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे तिकडे साहेबाचे ओटे नावाचे काही ओटे आहे. यांची सुद्धा रंजक कहाणी आहे. स्वातंत्र्यपुर्वकाळात एक इंग्रज अधिकारी सुर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी विजयदुर्गावर आला होता. त्यावेळी मिळालेले स्पेक्ट्रोग्राफ घेउन तो मायदेशात परत गेला आणि पुढे शास्त्रज्ञांनी 'हेलियम' वायुचा शोध लावला तेंव्हा या सुर्यग्रहणाच्या अभ्यासाचा त्यांनी वापर केला होता.

तटबंदिवरुन चालत असतांना दुपारची वेळ असल्याने खाली समुद्राचा बराच खोलवर तळ दिसत होता. त्याच्याकडे लक्ष ठेउन चालत असतांनाच एक डॉल्फिन दिसला. आणि मग हळुहळू कळपच असल्याचे लक्षात आले. तिकडेच त्यांच्या लिला बघत बसलो असतांनाच एका जोडीने थेट चित्रातल्या सारखी सुळकी घेतली आणि डोळ्याचे पारणे फिटले. पुढे तटबंदितील एक भुयार पाहीले प्रचंड उंची असलेले हे भुयार आजही सुस्थितीत आहे. काहीश्या अतृप्त मनाने विजयदुर्गाचा निरोप घेतला आणि परतलो. वाटेत रामेश्वराच दर्शन घेतले, रामेश्वराच्या खोदिव वाट फारच छान आहे. परततांना गगनबावड्याच्या वर असलेल्या गगनगडाकडे गेलो. वरुन घाटातील शोभा आणि संपुर्ण कोकण परिसर सुरेख दिसत होता. गगन गडाच्या माथ्यावर सुर्यास्ताच्या वेळी तिरंगा उतरला जात होता. त्याच्या साक्षीने जयजयकार करुन गगनगड उतरलो.

तीन दिवस सर्व काही विसरुन मनसोक्त भटकता आले, आणि अविस्मरणीय अश्या अनेक गोष्टी बघता आल्या.

वरील सर्व आणि अजुन काही फोटो सागरभ्रमण या लिंकवर बघायला मिळु शकतील.

Wednesday, April 25, 2007

विडंबन - केव्हा तरी पहाटे

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित अभिषेक-ऐश्वर्या विवाहामुळे अनेकांच्या मनात अनेक भाव दाटुन गेले. असेच काही भाव टिपण्याचा हा एक प्रयत्न . मुळ कविता या दुव्यावर बघायला मिळेल

जेव्हा घरी जयाच्या ....

(विवेक आणि सलमान) :
जेव्हा घरी जयाच्या , सजवुन कार गेली
सुजले रडुन डोळे, पलटून नार गेली ॥१॥

(सलमान :)
मारू आता कुणाला, सय दाटते कुणाची
हसवुन मिडियाला, फसवुन नार गेली ॥२॥

(सलमान विवेकला:)
जळलो तुझ्यावरी मी, उरल्या खुणा मनाशी
जळलो तुझ्यावरी मी, जळवुन नार गेली ॥३॥

(विवेक:)
फिरले क्षणात माझे, ग्रह एक त्या नभाचे
इमले स्वकल्पनाचे, उधळुन नार गेली ॥४॥

(राणी - अभिषेकशी लग्न करण्याची इच्छा अपुर्णच राहिली) :
उरली मनात आता, नशिबा कटू कहाणी
युवराज हा जयाचा, गटवुन नार गेली ॥५॥

--- सुभाष डिके (कुल)

Thursday, April 19, 2007

मी हसतो - माझ्यावर

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
*****************************************************
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
******************************************
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. रात्रीच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

Monday, April 16, 2007

ट्रेकींगच्या आठवणी (मोबाईलच्या साह्याने)

माहुलीच्या पायथ्याशी शंभुमहादेवाचे प्रसन्न देउळ


वासोट्याच्या पायथ्याशी
















माहुलीवरुन उतरतांना टळटळीत उन्हात नजरेला सुखावणारी रंगाची उधळण


















जुन्या वासोट्याच्या बाजुला असलेला बाबुकडा














माहुली - डावीकडे भंडारगड, मध्ये चंदेरी सुळका आणि उजवीकडे माहुली















खांदेरी - समुद्रात खंबीरपणे उभा असलेला
















कनकेश्वराच्या मंदिरावरिल कलाकुसर


















जंगली जयगडाहुन दिसणारी घाटातली वाट













वासोटा - नागेश्वराकडे जाणारी वाट














वासोट्याहुन परततांना













- सुभाष डिके

Thursday, April 12, 2007

अविस्मरणीय जंगली जयगड !!

खुपच सुंदर झाला हा ट्रेक. 'घनदाट' जंगल हे या ट्रेक चे वैशिष्ठ्य. प्रत्येक बाण्याच्या खुणेपाशी नजर पुढच्या खुणेचा शोध घेण्यासाठी भिरभिरत होती आणि त्याचवेळी मन त्या अनामिक गिरीप्रेमींना धन्यवाद देत होते. आणि 'त्या' माचीवरुन दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतीम, खाली दिसणारे गच्च जंगल, त्यामधुन धावणारी नागमोडी घाटातली वाट, या सगळ्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्य. इतर ट्रेक मधे कुठेतरी रस्त्याने मानवी अस्तित्वाच्या काही तरी खुणा जाणवत राहतात पण या जंगलात शिरल्यानंतर अशा काहीही खुणा दिसत नव्हत्या. काही क्षण स्तब्ध बसल्यानंतर पक्ष्यांच्या विविध आवाज मन प्रसन्न करुन टाकते. स्वतः चे अस्तित्व विसरायला लावण्याचे कसब या परिसरात नक्कीच आहे. वसंतगडावरचे पक्षीदर्शन, चाफळच्या राममंदीरातील प्रसन्न वातावरण, तिकडे मनसोक्त अनुभवलेल्या पक्ष्यांच्या लीला, आणि रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' , किती किती लिहावे काय काय आठवावे. हे सगळे सगळे दिर्घकाळ स्मरणात राहणार यात शंका नाही.. जयगडाच्या संदर्भातील एक लिन्क http://www.wikimapia.org/#y=17454951&x=73698939&z=17&l=0&m=a&v=2 उजविकडे दुरवर पसरलेले जंगल सगळे काही सांगुन जाईल .. सुभाष(कुल)

Thursday, March 22, 2007

वासोटा (व्याघ्रगड)

घनदाट या शब्दाचा पुरेपुर अर्थ कळतो वासोट्याला गेल्यावर. गच्च भरलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करतांना निसर्गाच्या कमालीचा अनेक वेळा प्रत्यय येत होता. आंबोळगीची चव अजुनाही तोंडावर रेंगाळते आहे.

ट्रेकर्सची पंढरी, इतरांना सर येईल काय
'भयाण' रस्ता तरिही, ओढीने चालती पाय
'घनदाट' जंगल अन पाण्यातुन प्रवास
याची साठी केला होता हा अट्टहास

नितळ पाणी ओढ्याचे, मारुती मार्गदर्शक
मनोहर विश्रांतीस्थळ अन बाबुकड्याचा धाक
उंच उंच झाडी, अन रानफुलांचा सुवास
याची साठी केला होता हा अट्टहास

मन झाले सैरभैर, कंठ आला दाटुन
असावीस तू आसपास, क्षणभर गेले वाटुन
इथे मी अन तिथे तू, मन होई उदास
याची साठी केला होता हा अट्टहास

Subhash Dike (सुभाष डिके)

Friday, March 09, 2007

आनंदाचा रम्य सोहळा

बऱ्याच दिवसापासुन कुठलाही ट्रेक झाला नव्हता, पावसाळ्यानंतर हिवाळा पुर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे होळीला चंद्रग्रहणाच्या रात्री सुधागडाला ट्रेक करायचा आहे, हे ऐकुनच मन प्रसन्न झाले. शब्दात लिहिता येणार नाही एवढा आनंद या ट्रेकने दिला. दुरवर पसरलेल्या गावांमधुन दिसणारी होळी, स्वच्छ चंद्रप्रकाश. चंद्र तर एवढा मोहक दिसत होता की, कुणालाही कविता सुचावी. एवढे अप्रतिम दर्शन देणारा चंद्र डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चंद्रग्रहणाचा दिड तास तर एक एक क्षण जपुन ठेवावा असाच होता. सर्वत्र पसरलेला प्रकाश, सुधागडावरील माळरान, सोबतीला गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज, मधुनच एखाद्या टिटवीनं ओरडुन जाणं, अशात हळुहळु चंद्रग्रहणाला सुरुवात, सपाट धरणीवर आडवे होउन आम्ही दुर्बिणीतुन त्या निसर्गाच्या चमत्काराचा आस्वाद घेतोय. आज लिहितांना सुद्धा अंगावर काटा येतोय, असे खुप कमी क्षण जगायला मिळतात. रोजच्या घाई गडबडीत आपण या सर्व स्वर्गीय गोष्टींना विसरुनच जातो, आणि अशा शांत वेळी निसर्गच आपल्याला हाताला धरुन त्याचा आस्वाद घ्यायला शिकवतो. संपुर्ण चंद्रग्रहण लागल्यावर, आकाश ताऱ्यांनी भरुन गेले होते. एरवी फार कमी वेळेला दिसणारे ताऱ्यांनी आभाळ गच्च भरले होते.

दिड दोन तास त्या मोहक वातावरणात काढल्याने ट्रेक सार्थ झाल्या सारखे वाटत होते, पण दुसऱा दिवस तर बोनस ठरला. सुंदर आणि प्रसन्न सकाळी, चवदार पोह्यांचा आस्वाद घययला मिळाला. त्यानंतर चोरदरवाजा ते महादरवाजा अशी गडाची सफर. त्यातच समोर आपल्या विशिष्ट आकारासहीत मस्त दर्शन देणारा तेलबैला आणि दुरवर पसरलेली सह्याद्रिची रांग. याच रांगेवरुन सह्याद्रीचे महाराष्ट्रभुमीवर किती विशाल छत्र आहे याची कल्पना येउन जाते आणि याच सह्याद्रिच्या कुशीत आपला जन्म झाल्याबद्दल अभिमानाने उर भरुन येतो, उन्हात डोळ्यांना सुखावणारी सुधागडावरची झाडे. सुधागडावरची झाडे फारच डौलदार आहेत, दोन्ही बाजुला प्रशस्त पसरलेली असतात. कडक उन्हातुन गेल्यानंतर अशी झाडे काय आनंद देत असतील हे अनुभवच सांगु शकेल. बोलत्या कडावरुन येणारा प्रतिध्वनी विचार करायला लावतोच. मग त्याच बोलत्याकड्यावरुन खड्या आवाजात गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार मारलेली आरोळी अजुनही कानात घुमत नसली तरच नवल. सुखाचे एवढे सगळे सोहळे एकत्र अनुभवुन आलो आणि पुढच्या अनेक दिवसांसाठी दैनंदिन व्यवहारातील संकटाना समोर जाण्याचे उंदड बळ मिळाले.
कुणालाही संधी मिळाल्यास कधीही सोडु नका असा हा ट्रेक.

Tuesday, February 20, 2007

आस्वाद

कुसुमाग्रजांच्या कविता - आस्वाद घेण्यासाठी

अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालोफ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्तचित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्रफ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !


पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू
तुझ्या मीकितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासेन
ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी
अन्मलाज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

Tuesday, January 16, 2007

पुरंदर दुर्गभ्रमण

नेहमीप्रमाणे या रविवारी सुद्धा कुठेतरी दुर्गभ्रमणासाठी जायचे असे ठरवले होते. इतर सर्व मंडळी आपापल्या कामात खुपच व्यस्त असल्यामुळे या वेळी सुद्धा एकट्याने जावे लागेल असे लक्षात आले आणि पुन्हा एकदा जी.एस. चा सल्ला घेतला आणि पुरंदरला जावे असे ठरवले. सकाळी उन जास्त होण्याच्या अगोदर सुरुवात करावी असा विचार करुन पाच वाजता लोणावळ्यातुन निघण्याचा विचार होता पण दुर्दैवाने अगदी धावत पळत जाउन सुद्धा पाच वाजताची लोकल चुकली मग नाईलाजाने सहा वाजता सुरुवात करावी लागली. पुण्यातुन पुरंदरला जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे पुण्यातुन दिवे घाट मार्गे सासवडला यावे आणि तिकडुन सासवड - नारायणपुर गाडी मिळवुन नारायणपुरला पोहोचावे. नारायणपुर हे पुरंदराच्या पायथ्याचे गाव, तेथील दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातुन थेट नारायणपुरला जाण्यासाठी सुद्धा गाडी मिळते. पुरंदरासाठी दुसरा मार्ग म्हणजे पुणे बंगलोर हायवे वर कापुरहोळ नावाच्या गावात पोहोचावे, आणि तिकडुन नारायणपुरला येण्यासाठी गाडी पकडावी. मी पुण्यात पोहोचल्यानंतर सासवड मार्गे नारायणपुरला पोहोचलो. मी पोहोचलो तेंव्हा साधारण दहा वाजले होते. नारायणपुरमधुन पुरंदरला जाण्यासाठी एक मोठा रस्ता मिळतो. हा वळवळणाचा रस्ता थेट आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी घेउन जातो. या रस्त्याने गाडी घेउन सुद्धा जाता येते. मी मात्र गावातुन जाणारा दुसरा एक छोटा रस्ता निवडला होता. हा रस्ता जंगलातुन जातो आणि थेट दरवाजा जवळ गावातुन येणार्या रस्त्याला जावुन मिळतो. या रस्त्याने गेल्यास अवघ्या पाउण तासात बिनिदरवाजावर पोहोचता येते. मी या रस्त्यावरुन निघालो. गावातुन निघुन पुढे अर्धा रस्ता संपेपर्यंत उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता. मागच्या वेळच्या अनुभवावरुन मी एकदम तयारी करुन गेलो होतो त्यामुळे उन्हापासुन चांगले संरक्षण झाले. पुढे मात्र दाट झाडी लागली, कडक उन्हातुन छान सावलीत आल्यानंतर खुप बरं वाटलं त्यामुळे पहिल्याच झाडाच्या सावली बराच वेळ बसलो. आता दरवाजा जवळच वर दिसत होता. झपाझप चालत जाउन दरवाजा गाठला, मागे वळुन बघितल्यावर दुरुन नारायणपुर मधुन येणारा वळणावळणाचा रस्ता दिसत होता. मधल्या रस्त्याने आल्यामुळे माझा वेळ आणि श्रम दोन्ही वाचल्याचं लक्षात आले.

आता समोर बिनि दरवाजा दिसत होता. दरवाजातुन आत गेल्याबरोबर डाव्या बाजुला एक छान जुने चर्च दिसले. उजव्या बाजुला थोडेसे मागे आल्यानंतर मुरारबाजीचा लढाईच्या आवेशातील पुतळा दिसला. पुतळ्याकडे बघुन खरोखर अंगावर रोमांच उभे राहतात. दोन सैनिक त्या पुतळ्याच्या आजुबाजुला आधुनिक चित्रकलांचे नमुने स्वच्छ करण्याचं काम करत होते. पुन्हा चर्चजवळ येउन पुढे निघालो. तेवढ्यात तिकडे आलेल्या एका कुटुंबाकडे माझे लक्ष गेले. त्या काकांनी लगेचच मला कुठुन आलास, एकटाच का आलास वैगरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग चला बरोबरच जाउ असा विचार त्यांनी मांडला, सोबत मिळते आहे हे लक्षात घेउन मी सुद्धा होकार दिला. पुढे गेल्यावर उजव्या बाजुला पुरंदरेश्वराचं मंदिर आहे, मंदिराची बांधणी खुपच सुबक अशी आहे, आणि परिसरातील भरगच्च झाडांनी एकुणच शोभा वाढलेली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यावर त्या सोबत आलेल्या काकांबरोबर झालेल्या चर्चेतुन त्यांची ओळख झाली आणि त्यांची सोबत लाभलेचा मला खुपच आनंद झाला. कारण ते स्वतः एका माध्यमिक शाळेत शिक्षक असुन १९८२ सालापासुन नियमीत दुर्गभ्रमण करत आहेत. एकट्याने, कुटुंबाबरोबर, ग्रुपबरोबर अश्या सर्वप्रकारांनी त्यांनी किल्याच्या भ्रमंती केलेली आहे. आजवर त्यांनी अनेक किल्ले अनेक वेळेला बघितले होते. राजगड, रायगड हे किल्ले तर सर्व मोसमात, सर्व वेळात, सर्व बाजुंनी असे पुर्ण केलेले आहेत. स्वतः शिवाजी चरित्रावर अभ्यास करत असुन, याच विषयावर त्यांनी व्याख्यान सुद्धा केलेली आहेत, त्याच बरोबर आध्यात्मिक प्रवचन सुद्धा करतात. या वेळी पुरंदरवर येण्याची सातवी - आठवी वेळ होती आणि प्रयोजन म्हणजे आपल्या कन्येचा अठरावा वाढदिवस इतिहासाच्या साक्षीने साजरा करण्यासाठी त्यांनी ही पुरंदरवारी केली होती. विशेष म्हणजे त्यांचं पुर्ण कुटूंबीय सुद्धा अगदी उत्साहात त्यांच्या सोबत आलेले दिसत होते. वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचं मला विशेष कौतुक वाटलं आणि अशा माणसाची संगत मिळणे म्हणजे पर्वणीच. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. पुरंदरेश्वराच्या उजव्या बाजुने एक वाट थेट बालेकिल्ल्यावर घेउन जाते. त्या वाटेने चालत थोड्याच वेळात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. समोर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे, आणि वळण घेतल्यावर लगेचच दिल्ली दरवाजा दिसतो. दरवाजाच्या अगदी समोर बुरुजात एक मारुतीची मुर्ती आहे. वर गेल्यावरोबर दिल्ली दरवाजात बसुन काकांच्या खणखणीत आवाजात शिवचरित्रातील काही भाग ऐकणे हा पुर्ण दिवसातील परमोच्च भाग होता. तिकडुन पुढे निघाल्यावर अत्यंत उत्साहात पुरंदराची कथा सांगत होते. त्यांच्या इतर ट्रेक च्या आठवणी, वैद्य सर नावाचे त्यांचे सहकारी यांच्या आठवणी, अनेक किल्ल्यांवर आलेले अनुभव या सर्व गोष्टी अगदी तन्मयतेने सांगत होते. दिल्ली दरवाजातुन पुढे गेल्यावर सरळ केदारेश्वराच्या मंदिराकडे जाता येते. मी एकटा असतो तर कदाचित याच वाटेने गेलो असतो, पण काका मला खाली केदार दरवाजा बघुन येउ असा आग्रह करत तिकडे घेउन गेले.

तटबंदिच्या बाजुने जात आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. वाटेत आम्हाला सातारा येथुन आलेला 'रानवाटा' नावाचा पंधरा वीस जणांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्याशी सुद्धा काकांची ओळख होती. पुढे चालत जाउन आम्ही केदार दरवाजावर पोहोचलो. दरवाजा एकेकाळी बंद करुन ठेवल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजुने माती ढासळलेली होती. केदार दरवाजा मधुन बाहेर निघुन बघितले. समोर एक सुंदर पठार दिसत होते. पुर्ण पुरंदराच्या बाजुने जीप जाईल एवढी मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे, मिलिटरीच्या ताब्यात पुरंदर असतांना या सर्व व्यवस्था केल्याचं कळलं. मग पुन्हा केदारेश्वराच्या मंदिराकडे निघालो. केदारेश्वराच्या मंदिराकडे जातांना काही पायया लागतात. त्या चढुन जातांना तुला पांडवांच्या स्वर्गारोहणाचा अनुभव येईल असं मला काकांनी सांगितलं, त्याचा मला काही अर्थ कळला नाही. मात्र त्या पायर्या चालु लागताच मला त्याचा अर्थ कळून आला. पाययाच्या दोन्ही बाजुने उंच भिंती आहेत त्यामुळे त्यांच्यामधुन चालतांना दोन्ही बाजुचे काहिही दिसत नाही, आणि समोर सुद्धा काही दिसत नाही वर फक्त आकाश दिसते. त्यांची ही उपमा मला खुपच आवडली. केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो. हे पुरंदरावरील सर्वोच्च ठिकाण आहे. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजुला गेल्याबरोबर समोर सिंहगड, राजगड, आणि तोरणा अगदी चटकन ओळखु येत होते. पुरंदराचा शेंदरया बुरुज, खंदकडा हा सर्व भाग दिसत होता. हे सर्व बघितल्यानंतर मंदिराच्या सावलीतच जेवणाला सुरुवात केली. एवढा वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत केल्यामुळे मला वेगळे जेवण करु देणे शक्यच नव्हते. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडुन निघालो. आता पुन्हा दिल्ली दरवाजा जवळ आल्याबरोबर परत राजगादी बघण्यासाठी मागे निघालो. राजगादी ही जागा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ. तिकडे पोहोचल्यावर मात्र थोडासा भ्रमनिरास झाला आणि वाईट सुद्धा वाटलं. छत्रपतींच्या प्रथम पुत्र, स्वराज्याचे युवराज, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्मस्थळाची ही अवस्था. आज तिकडे फक्त तटबंदी शिल्लक आहे. तिकडुन माघारी फिरल्यानंतर पुन्हा दिल्ली दरवाजावर पोहोचलो. आता बालेकिल्ला उतरुन निघायला सुरुवात केली. खाली उतरल्यावर वज्रगडावर जाण्याची अत्यंत इच्छा होती पण वेळ शिल्लक नसल्याने आता माघारी परतावे लागणार होते. मग परत आम्ही बीनी दरवाजावर पोहोचलो. परत एकदा मुरारबाजीचा पुतळा बघितला आणि दरवाजातुन मागे परतायला सुरुवात केली. संपुर्ण दिवस अगदी मनासारखा गेल्याने उतरतांना खुप समाधान जाणवत होते. पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिर आणि शिवमंदिर बघितले. मग पुण्याकडे जाण्याअगोदर जवळच असलेल्या बालाजीचं दर्शन घेतले आणि संध्याकाळी पुण्यात येउन पोहोचलो. संपुर्ण दिवसभराच्या श्रमाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. आणखी एक रविवार अतिव आनंद आणि समाधान देउन संपत होता.

Tuesday, January 02, 2007

विडंबन: अजुन तरी

सर्व वाचकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे.

मुळ कविता :

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर

आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर

अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर

मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी

कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी

अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी

मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी

रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी

सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी

अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते

वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते

कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते

मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...



विडंबन:

(आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न)

अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर

त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर

अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर

शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती

कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती

मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती

सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥

दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर

कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर

वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर

निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा'

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥

मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय

तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय

मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय

जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा

खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा



---- सुभाष डिके (कुल)